अमरावती, २५ फेब्रुवारी (वार्ता.) - सध्या समाजात गणेशमूर्ती विविध रूपांत आणि पेहेरावात पहायला मिळतात. धर्मशिक्षणाचा अभाव आणि केवळ कल्पनाविलास अन् आधुनिक जीवनप्रवाहामुळे समाज असे करण्यास उद्युक्त होतो. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करावा लागतो. म्हणून मूर्तीकार मूर्ती बनवतांना शास्त्र विसरून मूर्ती बनवतात. आम्हालाही अध्यात्मशास्त्रदृष्ट्या गणेशमूर्ती बनवायला आवडेल, अशा प्रतिक्रिया अनेक मूर्तीकारांनी व्यक्त केल्या.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काही मूर्तीकारांना संपर्क करून त्यांना मूर्ती शाडूच्या मातीच्या आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून बनवण्याची विनंती या वेळी करण्यात आली. त्याला मूर्तीकारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. पल्लवी हंबर्डे, सौ. बेला चव्हाण, सौ. छाया टवलारे, सौ. अभ्यंकर, सौ. रेखा मालपाणी यांनी मूर्तीकारांना संपर्क करून त्यांना धर्मशास्त्र समजावून सांगितले.
प्रतिक्रिया :
१. श्री. दिनेश टेंभरे, युवा अध्यक्ष, मूर्तीकार संघटना - आम्ही समाजात यासाठी प्रबोधन करू.
२. सर्वश्री शंकरराव मुंदे आणि बद्रीनारायण गोरले, मूर्तीकार - मूर्ती शाडू मातीची असावी, असे आम्हालाही वाटते; पण समाजाच्या मागणीप्रमाणे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवतो. अमरावतीला योग्य अशी शाडूची माती मिळत नाही.
३. श्री. रवि चिल्होरकर, मूर्तीकार - शास्त्रानुसार मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. आम्ही आजपासून नामजप करत मूर्ती तयार करणार !