नेरूळ - अलीकडे बोलबाला झालेल्या क्लोनिंग, टेस्ट ट्यूब बेबी,
गुणसूत्रे आदी शोधांचे मूळ वेद आणि महाभारतकालीन संशोधनात सापडते.
त्याकाळातील या शोधांकडे भारतीयांचे दुर्लक्ष झाले, अशी खंत डॉ. प.वि.
वर्तक यांनी व्यक्त केली. नेरूळमधील सेक्टर ३८ मधील ‘केंद्रीय विहार’मध्ये
कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
‘वेदातील विज्ञान’ या विषयावर बोलतांना डॉ. वर्तक म्हणाले की, आपण
स्वाभिमान आणि अस्मिता गमावून बसलो आहोत. त्यामुळे वेदकालीन विज्ञानातील
प्रगतीकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. आपल्या ऋषीमुनींनी गणित, जीवशास्त्र,
कालमापन, शस्त्रास्त्रविद्या, पंचांगशास्त्र, आदींचा प्रचंड संशोधन करून
शोध लावला. कार्यक्रमाचा प्रारंभ कविवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस
भाग्य’ या गीताने झाला. मुग्धा करमरकर आणि सुनीता पाठक यांनी हे गीत सादर
केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ललित पाठक, नारायण केळसकर आदी उपस्थित
होते.