मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेले कार्यकर्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांनी आजवर काहीच वाईट केलेले नाही. पक्षासाठी त्यांनी बरेच सोसले आहे. त्यामुळे सर्वच आपले आहेत. यातील अनेकांना उमेदवारी मिळणार नसली, तरी आपणाला पक्षात बंडखोरीची चिंता नाही, असे ठाम प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी वार्तालाप करतांना रवींद्र नाट्यमंदिरातील मेळाव्यात केले.
उमेदवारांची घोषणा दोन दिवसांत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण एकट्याने आटोपल्या. निवड प्रक्रिया अत्यंत किचकट आणि संभ्रमात टाकणरी होती. अनेक प्रश्न उभे ठाकत होते. मानसिक दमछाक करणारी ही निवडप्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी उद्या किंवा परवा करण्यात येईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांतील अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. निवड प्रक्रिया राबवतांना अनेकांना द्यावा लागणारा नकार मनाला क्लेषदायक होता. मी उमेदवारी न मिळाल्यांच्या कुटुंबियांची क्षमा मागतो.