![]() |
| कुर्ला ते मुलुंड विभागाचे तहसीलदार विनोद गोसावी यांना निवेदन देतांना आमदार सरदार तारासिंग आणि हिंदुत्ववादी |
मुंबई - प्रजासत्ताकदिनी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे ध्वज ध्वजवंदनानंतर गटारात आणि रस्त्यावर पडलेले दिसतात. यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवण्यात आली. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी तहसीलदार, पोलीस, महापौर आदी शासकीय ठिकाणी निवेदने देऊन आणि जनतेचे प्रबोधन करून राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.
कुर्ला ते मुलुंड विभागाचे तहसीलदार आणि घाटकोपर (प.) पोलीस ठाणे यांना निवेदन मुंबई - कुर्ला ते मुलुंड विभागाचे तहसीलदार विनोद गोसावी यांची त्यांच्या मुलुंड येथील कार्यालयात भेट घेऊन राष्ट्रध्वजाची होत असलेली विटंबना थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले. मुलुंड विभागाचे भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांना संपर्क केला असता त्यांनी सदर विषय समजून घेतला आणि समितीच्या कार्यकर्त्यांसोबत तहसीलदारांची त्वरित भेट घेऊन राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याविषयी सूचना दिल्या. या वेळी आमदार सरदार तारासिंग यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. समितीच्या शिष्टमंडळात श्री. सतीश सोनार, श्री. काशीराम परब, आमदार सरदार तारासिंग, बजरंग दल सहसंयोजक श्री. रमेश गुप्ता, महामंत्री-झोपडपट्टी जनता परिषद मुंबईचे श्री. के. राजकुमार सहभागी झाले होते.
घाटकोपर (प.) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चारुदत्त झेंडेकर यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. प्रदीप सावंत, स्वर-राज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संदीप राणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार आणि श्री. दामोदर रेड्डी हे सहभागी होते.
घाटकोपर येथे जनप्रबोधन चळवळ
मुंबई - हिंदु जनजागृती समितीकडून घाटकोपर (प.) येथील वेलकम हॉटेलसमोर राष्ट्राध्वजाविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. समितीचे १८ कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
महाड येथे तहसीलदार आणि पोलीस यांना निवेदन
महाड - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार आणि पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि विक्री यांवर बंदी आणण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतांना श्री. सुरेश पुरोहित, सौ. अर्चना कवे, सौ. ज्योती मुरुडकर, श्री. विनायक वाडकर आणि श्री. घोलप हे उपस्थित होते.
धुळे येथे महापौर आणि तहसीलदार यांना निवेदने
धुळे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे महानगरपालिकेच्या महापौर आणि राजूरा, जिल्हा चंद्रपूर येथील तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली .
धुळे येथे महापौर सौ. मंजुळा गावित यांना निवेदन देतांना भाजपचे नगरसेवक श्री. हिरामण आप्पा गवळी, लोकसंग्राम पक्षाचे श्री. सागर चौधरी, शिवसेनेचे श्री. बबन थोरात आणि श्री. पोद्दार उपस्थित होते.
राजूरा येथे तहसीलदारांना निवेदन देतांना सर्वश्री नामदेव उरकुडे, सुरेश बोबडे, विनोद कोंगरे, मानू तिवारी, मयूर गौरकार, अमित जयपूरकर, रवी बुरडकर, बादल बेले आणि मंगेश श्रीराम उपस्थित होते.
वणी येथे उपविभागीय अधिकारी आणि आणि मारेगाव येथे तहसीलदार यांना निवेदने
वणी (जि. यवतमाळ) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वणी येथे उपविभागीय अधिकारी वर्हाटे आणि मारेगाव येथे तहसीलदार खांदवे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. महादेव गिरसावळे, श्री. प्रदीप उंबरकर, श्री. दत्ताभाऊ तिखट, श्री. भास्कर नवले आदी उपस्थित होते.
सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने प्रवचन
पनवेल - सनातन संस्था रायगड न्यासाच्या वतीने तालुक्यातील नेरे हायस्कूल भाग शाळा विहिंघर येथे ग्रामपंचायतीच्या शाळेत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ५ ते ९ वी इयत्तेतील २२५ विद्यार्थ्यांनी घेतला. न्यासाच्या शशीकला भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे शिक्षकही उपस्थित होते.
मुंबई येथे ‘गुरुकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने ‘राष्ट्रजागृती’ उपक्रम
मुंबई - देशाच्या भावी पिढीत राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी मुंबई येथे ‘गुरुकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने ‘राष्ट्रजागृती’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलुंड येथील मुलुंड विद्यामंदिर शाळेत प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली, तसेच ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान हाच खरा राष्ट्राभिमान’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना प्रतिष्ठानच्या सौ. प्रणाली कोचरेकर यांनी राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगून क्रांतीकारकांनी देशासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले. या वेळी ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
