उच्च न्यायालयाच्या कक्षेतून महत्त्वाची कागदपत्रे गहाळ
मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - माथूरदास गोकुळदास यांच्या मालकीच्या मुंबई येथील कुलाबा, ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, माझगाव आणि ठाणे येथील येऊर या मोक्याच्या ठिकाणांकडील एकूण ५०० एकर भूखंडावरील वाद मुंबई उच्च न्यायालयात तब्बल ४५ वर्षांपासून प्रलंबित आहे.
या महत्त्वाच्या प्रकरणाची सर्वच्या सर्व कागदपत्रे न्यायालयाच्या कक्षेतून गहाळ झाल्याचे उघडकीस झाल्याने या प्रकरणाची न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी गंभीरपणे दखल घेतली आणि ही कागदपत्रे का गहाळ झाली, याचे अन्वेषण करण्याचा आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला नुकताच दिला आहे. या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) - माथूरदास गोकुळदास यांच्या मालकीच्या मुंबई येथील कुलाबा, ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, माझगाव आणि ठाणे येथील येऊर या मोक्याच्या ठिकाणांकडील एकूण ५०० एकर भूखंडावरील वाद मुंबई उच्च न्यायालयात तब्बल ४५ वर्षांपासून प्रलंबित आहे.
जुलै २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची कागदपत्रे शोधण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार न्यायालयातील यंत्रणेकडून शोधाशोध करण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी न्यायालयातील धारिका ठेवल्या जातात, त्या त्या ठिकाणांमधून या प्रकरणाची कागदपत्रे शोधल्यानंतरही ती सापडली नाहीत. खिस्ताब्द १९७० मध्ये तत्कालीन न्यायमूर्ती जे.एल्. नैन यांनी या प्रकरणी काही सुनावणी घेतल्या होत्या. त्याचाही सारांश गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. या विषयी बोलतांना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या कक्षेत असलेली कागदपत्रे गहाळ होणे अतिशय चिंतेची बाब आहे. उच्च न्यायालय म्हणजे न्यायालयीन कामाचे एकप्रकारे दस्तऐवज समजले जाते. अशा ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे नष्ट होणे अथवा गहाळ होणे, हे उच्च न्यायालयाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारे आहे.’’
या प्रकरणात केंद्रशासनाच्या वतीने अधिवक्ता खंबाटा आणि अधिवक्ता विवेक तन्खा, तर याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता राजेश बिंद्रा काम पहात आहेत.