बालेश्वर (ओडिशा), ३० सप्टेंबर - भूमीवरून भूमीवर मारा करणार्या ‘अग्नी-२’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज सकाळी ९.३० वाजता ओडिशाच्या किनारपट्टीजवळील प्रक्षेपण स्थळावरून भारताने यशस्वी चाचणी केली.
‘अग्नी-२’ हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र असून २ सहस्त्र किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदण्याची त्याची क्षमता आहे.‘अग्नी-२’ मध्ये दोन टप्प्यांत वापरले जाऊ शकणारे घन इंधन वापरण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्राची लांबी २० मीटर एवढी आहे. अण्वस्त्रसज्जतेच्या तसेच संरक्षणाच्या दृष्टीने ‘अग्नी-२’ महत्त्वाचे आहे. सैन्यदलामध्ये यापूर्वीच ‘अग्नी-२’ चा समावेश करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक नेव्हीगेशन यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे ते लक्ष्याचा अचूक वेध घेते. गेल्या महिन्यात २९ ऑगस्ट या दिवशी ‘अग्नी-२’ची चाचणी होणार होती; परंतु ती तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.