नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरण
मुंबई, ३० जून - नीरज ग्रोव्हर यांच्या हत्येच्या प्रकरणी एमिल जेरोम मॅथ्यू याला आणि पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी कन्नड अभिनेत्री मारिया सुसाइराज हिला आज मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी उद्या होणार आहे.
चित्रपट क्षेत्रात नाव कमावण्यासाठी मारिया मुंबईत आली. या वेळी तिची भेट ‘सिनर्जी अॅडलॅब’मधील नीरज ग्रोव्हर यांच्याशी झाली. या वेळी तिला काम देण्याचे आश्वासन नीरज यांनी दिले. यानंतर दोघांची जवळीक निर्माण झाली. ६ मे २००८ या दिवशी मारियाच्या मालाड येथील घरात नीरज रहायला गेले होते. त्याच वेळी तिचा प्रियकर लेफ्टनंट मॅथ्यू याने तिला कोचीहून दूरध्वनी केला. तेव्हा त्याच्या कानावर नीरज ग्रोव्हर यांचा आवाज पडला आणि तो भडकला. दुसर्या दिवशी सकाळी तो विमानाने घरी आला आणि धारदार हत्याराने नीरज यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर नीरज यांच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ते पिशव्यांमध्ये भरले आणि मित्राची गाडी मागवून ते मनोरजवळील जंगलात नेऊन या पिशव्या पेटवून दिल्या; पण अर्धवट जळलेल्या पिशव्या पोलिसांच्या हाती लागल्या आणि हे संपूर्ण प्रकरण उघड झाले.