दायित्वशून्य मंत्री !
मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) - विधान परिषदेतील सकाळच्या सत्रातील कामकाज पार पडल्यावर दुपारच्या सत्रात राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चा पुकारण्यात आली; परंतु या चर्चेच्या वेळी सदनात एकही मंत्री
अथवा राज्यमंत्री उपस्थित नसल्याचे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी निदर्शनास आणले. परिणामी सदनाचे कामकाज २ वेळा १०-१० मिनिटांसाठी रहित करण्याची पाळी उपसभापतींवर आली. (विधीमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज चालवण्यासाठी जनतेच्या कररूपी पैशातून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतांना सभागृहात मंत्री अनुपस्थित राहिल्याने कामकाज स्थगित करावे लागणे, हा मंत्र्यांचा जनताद्रोहच होय ! असे दायित्वशून्य मंत्री जनतेचे भले काय करणार ? अशा मंत्र्यांना जनतेने आगामी निवडणुकीत कायमचेच घरी बसवायला हवे ! - संपादक)अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सर्वच विभागांच्या मंत्र्यांनी अथवा किमान राज्यमंत्र्यांनी उपस्थित राहून सदस्यांनी चर्चेच्या वेळी केलेल्या सूचनांची नोंद घ्यावी, हे अपेक्षित आहे. सदस्यांनी केलेल्या सूचना अथवा विषय यांच्या अनुषंगाने अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर मिळावे, असा प्रघात आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या चर्चेला मंत्र्यांनी उपस्थित रहाणे अनिवार्य ठरते. तथापी या चर्चेची टाचणे घेण्यास कोणी मंत्री अथवा राज्यमंत्री उपस्थित नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे याचा निषेध विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज नोंदवला. परिणामी उपसभापतींनाही कामकाज स्थगित करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यानंतर धावाधाव करून मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित रहातील, याची व्यवस्था सत्ताधार्यांनी केली.